संततधार पावसामुळे क्षतिग्रस्त झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या



शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री जराते यांची मागणी


गडचिरोली : मागील आठवडा भरापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली. आपदग्रस्तांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील सर्व पूरबाधीत गावांतील शेतीचे आणि घरांच्या पडझडीचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षांच्या महिला नेत्या जयश्री जराते यांनी केली आहे.


सोमवारला गुरवळा, शिवनी, कृपळा, वाकडी या गावांना भेटी देवून पुरग्रस्त शेती आणि घरांच्या पडझडीची पाहणी केल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गडचिरोलीच्या तहसिलदारांना लिहिलेल्या पत्रात जयश्रीताई जराते यांनी म्हटले आहे की, आज मौजा - गुरवळा येथे भेट दिलेली असता श्रीमती सावित्राबाई सिताराम तुनकलवार यांचे घर पडून २ बैल जखमी , ७ कोंबड्यांचा मृत्यू तर मुलगा हरबाजी तुनकलवार यांचे दुचाकी वाहनाची तुटफुट होवून नुकसान झाली. तर अजय मेश्राम, पुनाजी मनिराम भोयर, जोगेश्वर गोमाजी तुनकलवार यांचेही राहते घर पडून प्रचंड नुकसान झाले.


तसेच मौजा - शिवनी येथील पंढरी विठ्ठल निकुरे, नारायण विठ्ठल निकुरे, नामदेव ॠषी निकुरे, निलकंठ पेंदाम यांचेसह अनेक शेतकऱ्यांची शेती व रोवणे मागील आठवडाभरापासून पाण्याखाली आलेले असतांनाही स्थानिक स्तरावर पंचनामे करण्यात आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व पूरबाधीत गावांतील शेतीचे व घर पडझडीचे पंचनामे करण्यात येवून नुकसान भरपाई मिळण्यासाठी वरीष्ठ कार्यालयाकडे तातडीने अहवाल पाठवावे, अशी मागणीही जयश्रीताई जराते यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments